डिजीटल अटक प्रकरणात मोठा भांडाफोड : ८ आरोपींना अटक, २२ लाखांची रक्कम गोठवली

पालघर | प्रतिनिधी: बोईसर पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी मिळून डिजिटल फसवणुकीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश करत आठ आरोपींना अटक केली असून, २२ लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. हे प्रकरण एका ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अटक’चा बनाव करून तब्बल ३.५६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आहे.

दिनांक १८ डिसेंबर २०२४ ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान, अंधेरी पोलीस ठाण्यातून बोलतो असे भासवणाऱ्या व्यक्तींनी फिर्यादी अनिलकुमार विष्णु आरेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना तुमचा नंबर ‘इललिगल अॅडव्हरटायझिंग’ प्रकरणात सापडल्याचे सांगितले. सीबीआय तपास सुरू असून पोलीस कस्टडीत घेण्याची धमकी देत गोपनीयतेचा बडगा दाखवण्यात आला. त्यानंतर ‘सीबीआय पब्लिक प्रोसिक्युटर’ असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या खात्यातील रक्कम तपासासाठी पाठवण्यास भाग पाडले. विश्वास संपादन करून त्यांनी ३,५६,६०,०००/- रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले.

सदर गुन्ह्याची नोंद भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१९(२), २०४ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (सी) व ६६ (डी) अंतर्गत बोईसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण करत नागपूर, गुजरात व बिहार येथून खालील आरोपींना अटक करण्यात आली:

1. मो. सैफ रिजवान अन्सारी (नागपूर)
2. मो. फैज रिजवान अन्सारी (नागपूर)
3. मो. झोएब रिजवान अन्सारी (नागपूर)
4. गुणवंत रामराव मते (नागपूर)
5. झकरीया असरार झोया (अंकलेश्वर, गुजरात)
6. शोएब मोहम्मद शहा (अंकलेश्वर, गुजरात)
7. रिझवान साबीर मलिक (अंकलेश्वर, गुजरात)
8. बाबर मो. सिराज खान (औरंगाबाद, बिहार)

प्राथमिक तपासात आंतरराष्ट्रीय लिंक असल्याचा संशय निर्माण झाला असून तपास अजून सुरू आहे. आरोपी क्र. १ ते ७ यांना ११ एप्रिल रोजी पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून आरोपी क्र. ८ याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, व उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तपासाची धुरा पोलीस निरीक्षक शिरीष पवार (बोईसर पोलीस ठाणे) व अजय गोरड (सायबर पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखालील पथक सांभाळत आहे.

या कारवाईमुळे डिजिटल फसवणुकीच्या गुन्ह्यांवर मोठा आळा बसला असून नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *