रासायनिक द्रव्य सांडल्याने नागरिकांच्या आरोग्यावर धोका: प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

तारापूर, २३ फेब्रुवारी: तारापूर औद्योगिक क्षेत्रातून हजार डस्ट वेस्ट वाहून नेणाऱ्या वाहनातून रस्त्यावर रासायनिक द्रव्य सांडत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. सांडलेल्या रसायनामुळे रस्त्यावर तीव्र दुर्गंधी पसरली असून, हवेत घातक वायूंचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज रविवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास, सुट्टीचा फायदा घेत बोईसर-चिल्हार मार्गावरून जाणाऱ्या MH05 DK 6371 क्रमांकाच्या वाहनातून रासायनिक द्रव्य सांडत असल्याचे निदर्शनास आले. तारापूर औद्योगिक क्षेत्रातून विल्हेवाटीसाठी नेले जात असताना हे वाहन मुख्य रस्त्यावरून द्रव्य सांडत जात होते. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर सवाल उपस्थित झाले आहेत.
रासायनिक द्रव्यामुळे परिसरातील जलस्रोत आणि शेती दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तात्काळ उपाययोजना करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
नागरिकांनी यापूर्वीही तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) अनेक तक्रारी केल्या असतानाही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे परिसरातील जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासन यावर कोणती कारवाई करणार? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *